श्रीपूर मर्डर केस
मी अप्पर पोलीस निरिक्षक अमेय भोसले मागील ७ वर्षांपासून माळशिरस ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये माझी कामगिरी पार पाडत आहे. आज पर्यंत बऱ्याच गुंतागुंतीच्या केसेस अगदी मनापासून सोडविल्या आणि आरोपीना बेड्या ठोकण्यात यश मिळविले. खरे तर हे टीम वर्क आहे आणि सर्वानी आपापली कामे मन लावून केली तर कुणाही निष्पाप माणसावर अन्याय होणार नाही त्यांना नेहमी न्यायचं मिळेल असे माझे वयक्तिक मत आहे . बऱ्याच ठिकाणी मला मुलाखतीमध्ये विचारतात कि, अशी कोणती केस आहे जी सोडविताना मला खूप त्रास झाला. तर मी नेहमी ह्या श्रीपूर मर्डर केसबद्दल सांगतो कारण हि केसच अजब होती . दोन वर्षांपूर्वी श्रीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका २ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती . या अत्याचाराची बळी ठरलेली ही मुलगी फक्त २ वर्षाची होती. बलात्कारानंतर आरोपीने तिची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न करून तिची हालचाल बंद झाल्यानंतर तिला शेतात फेकून आरोपी तेथून फरार झालेला. या घटनेनंतर मी पोलिसांचे पथक घेऊन, सोबत श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमही घेऊन ताबडतोप घटनास्थळाला भेट दिली होती परंतु आमच्या हाती एकही पुरावा सापडला नव्हता. कारण आरोपीने खूप थंड डोक्याने हे मानवतेला काळिमा फासणारे क्रूर कृत्य केले होते.
नोव्हेंबर २०१८ ची दिवाळीची सकाळ मी अजून झोपेतच होतो आणि अचानक हवलदार एकतपुरें चा फोन आला, ते म्हणाले कि श्रीपूर-अकलूज रोडवर महाळुंग जवळ अंदाजे २ वर्षाच्या मुलीचा मृतदेह गावकऱ्यांना मिळाला असून तातडीने आपल्याला घटनास्थळी निघाव लागेल. मी १५-२० मिनिटामध्ये घटनास्थळी पोहचलो आणि घडलेला सर्व प्रकार पाहिला. माझ्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये पहिल्यांदा मी इतकी भयंकर केस पाहत होतो कि, ज्यामुळे माझ्या मनाची स्थिती अगदी अस्थिर होऊन गेलेली. मला त्यादिवशी पहिल्यान्दा असे जाणविले कि, "आपण माकडापासून मानवापर्यंत च्या उत्क्रांती नावाच्या प्रवासात फक्त अंगावर कपडे घातले. परंतु खरे पाहिले तर मानवापेक्षा नागडा ह्या पृथ्वीतलावर कुणीही नाहीये". त्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचा जीव घेतलेला आणि रस्त्याच्या कडेला एखादे फुटलेले खेळणे टाकल्यासारखे टाकून तो नराधम पळून गेला होता. आम्ही मृतदेह ताब्यात घेतला पंचनामा केला. मुलीचे प्रेत सरकारी दवाखान्यात पोस्टमोर्टम साठी पाठविले आणि ह्या मर्डर मागील आरोपीला शोधण्याची शोध मोहीम सुरु केली. घटनेचे गांभीर्य ओळखून आम्ही सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक अरुण सरदेशमुख , जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक औदुंबर देवडे आणि माळशिरस उपविभागीय पोलीस अधिकारी एस. टी. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात केली.
आमच्या सर्व टीमला संपूर्ण माळशिरस तालुका आणि ह्या तालुक्यात राहणारी माणसे त्यांच्या वृत्ती माहिती होत्या. त्यामुळे प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर आमचे खबरी लोक मनापासून माहिती गोळा करू लागले. मी स्वतः आजूबाजूच्या घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून होतो परंतु कुठेही कसलीही संशयास्पद हालचाल आढळली नाही. खरे पाहिले तर हे श्रीपूर-बोरगाव खूप छोटे गाव होते १५-२० मिनिटात संपूर्ण गाव फिरून होईल त्यामुळे ह्या घडलेल्या घटनेबद्दल संपूर्ण गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली. पोलीस स्टेशन समोर अक्खा गाव गोळा झालेला त्यात बरेच लोक आमच्या कडे त्या चिमुकल्या मुलीला न्याय मिळवून द्या असे नजरेनेच सांगत होते. वाटत होते कि, कुणीतरी येईल आणि ती मुलगी माझी आहे असे सांगून प्रेत ताब्यात घेईल. परंतु संपूर्ण माळशिरस तालुक्यातून कुणीही पुढे आले नाही. मनात प्राथमिक शंका येत होती कि, हि मुलगी ऊसतोड कामगारांची असेल परंतु कारखाना तर बंद होता. शिवाय मुलीच्या पायामध्ये चांदीचे वाळे होते त्यावरील हॉलमार्क हा गावातील सराफाच्या दुकानातील होता. त्यामुळे मुलगी बाहेरची कुठलीही नसून गावातीलच आहे हे निश्चित होते.
पहिला एक दिवस असाच गेला काहीही थांगपत्ता लागला नाही शिवाय मुलीचे प्रेत ही ताब्यात घेण्यासाठी कुणी आले नाही. रात्रीचे १० वाजले मी मिटिंग घेऊन सर्व खबरी आणि आमचे पथक एकत्रित बोलावून दिवसभरातील घडलेल्या सर्व घटनांचा आढावा घेतला. कुठून काही कळायला मार्ग नव्हता कारण हि घटना नेमकी रात्री आणि श्रीपूर व महाळुंग ह्या दोन छोट्या गावांच्या मध्यभागी घडली होती. मी विचार करत माझ्या केबिन मध्ये बसलो होतो आणि हवलदार एकतपुरें ड्युटी संपवून घरी परतण्याच्या विचारात होते. अचानक हवलदार एकतपुरें यांच्या डोक्यात एक विचार आला ते मला म्हणाले की, "साहेब ही केस भोंदूगिरीतून तरी झाली नसेल ना ?" . मी विचारलं, "कश्यावरुन तुम्ही असे म्हणताय एकतपुरें ? ". साहेब तुम्हाला आठवत असेल ६-७ महिन्यापूर्वी कुणीतरी अकलूज मध्ये " स्वामी भोंगानंद बाबा " नावाचा एक इसम लोकांकडून पैसे घेऊन फसवितोय अशी फिर्याद एका कुटुंबाने केलेली. हो, हो परंतु एकतपुरें त्याचा ह्याच्याशी काय संबंध ? अहो साहेब नीट लक्षात घ्या त्या कुटुंबाला हि, " स्वामी भोंगानंद बाबा " ने दोन गावांच्या मध्यभागी एक बोकड कापायला आणि अजून उतारे वगैरे ठेवायला सांगितले होते कारण त्यांना मुलबाळ होत नव्हते. कदाचित "स्वामी भोंगानंद बाबा " चा ह्याही घटनेमागे हात असू शकतो. परंतु एकतपुरें आपण त्या "स्वामी भोंगानंद बाबा " च्या मुसक्या आवळून तेंव्हाच हाकलून लावलेले. हो बरोबर आहे साहेब आपण त्याला पळवून लावले. परंतु मी असे ऐकून आहे कि, आपल्या गावातील बरेच लोक त्या बाबा चे अंधभक्त आहेत. आजही बरेच लोक त्याला गुपचूप भेटून अघोरी कृत्ये करतच असतात. काय हा मूर्खपणा आहे एकतपुरें पहा ना, “जग तिकडे चंद्रावर चाललंय आणि ह्या गावातील लोक अजून भोंदूगिरी अंधश्रद्धा यांच्यामध्येच गुरफटून पडलेत”. धर्माच्या नावाखाली धार्मिक कर्मकांडांची अवडंबरे माजवून हे तथाकथित साधू, संत, बाबा, महाराज स्वत:च्या तुंबडय़ा तेवढय़ा भरत असतात. चार ग्रंथ वाचायचे. चार मंत्र म्हणायचे. भगवी, सफेद, काळी, पिवळी वस्त्रे पांघरायची. आध्यात्मिक गडबडगुंडा करायचा. चमत्कार दाखवायचे आणि अडाणी लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचे हाच या भोंदू बाबांचा उद्योग. असो हा न संपणारा विषय आहे एकतपुरे. आपण उद्या पाहू तुम्ही आता घरी जा आणि उद्या लवकर या. एकतपुरें गेले परंतु माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती मी एक चहा घेतला आणि परत ह्या संपूर्ण घटनेचा विचार करत बसलो. अखेर रात्रीचे १ वाजले आणि मी घराकडे निघालो. खूप थकलो होतो त्यामुळे विचार करत करत कधी झोपी गेलो समजलेच नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि एकतपुरें दोघांनी श्रीपूर आणि बोरगाव मधील सर्व दवाखाने पालथी घातली. जिथे जिथे प्रसूती ची सोय आहे तिथे कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांकडून फिरून माहिती काढली. श्रीपूर मध्ये फक्त २ दवाखाने असे होते कि, जिथे मूल जन्माला येते त्यांच्याकडील मागील ३ वर्षाच्या सर्व केसेस च्या डिटेल्स घेतल्या. मागील ३ वर्षात जन्म झालेल्या सर्व बालकांच्या बद्दल माहिती काढली तर कुठेही काही संशय येईल अशी माहिती मिळाली नाही. पोलिसांचा हा सुद्धा मार्ग फसला होता कारण दोन्ही दवाखान्यात जन्माला आलेली मुले व्यवस्थित होती. कदाचित अशी एखादी फॅमिली असू शकते त्यांनी त्यांच्या बाळाला दुसरीकडे जन्म दिला असेल त्यामुळे इथे दवाखान्यातून मिळालेल्या यादीमध्ये त्या बालकाचे डिटेल्स नसतील. दुसरा दिवस ही असाच गेला काहीही हाती लागले नाही. माझ्या टीममधील सर्वजण मनापासून कामाला लागले होते कारण होते त्या निष्पाप बालकाचा निरागस चेहरा.
दुसरा मार्ग म्हणून आम्ही त्या "स्वामी भोंगानंद बाबा " च्या कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या सर्व अंधभक्तांची लिस्ट बनविली आणि लिस्ट मधल्या लोकांची कसून चौकशी सुरु केली. दुपारच्या जेवणानंतर अजून एक धक्कादायक बातमी अकलूज पोलीस पथकाकडून समजली ती म्हणजे आज सकाळी ७ वाजता "स्वामी भोंगानंद बाबा " इंदापूर हुन अकलूज ला जाणाऱ्या एस. टी. च्या धडकेने जागीच मरण पावला होता. आता मात्र आम्हाला खूप टेन्शन आले कारण ह्या "भोंगानंद बाबा" कडून काहीतरी माहिती मिळवून ह्या श्रीपूर मर्डर केस ला पुढे जाण्यास रस्ता मिळणार होता परंतु तो रस्ता ही बंद झाला. नक्कीच ह्या भोंदू बाबाचा आणि ह्या मुलीच्या मर्डर चा कुठंतरी काहीतरी संबंध आहे हे निश्चित झाले होते. आम्हाला फक्त तो धागा शोधावा लागणार होता परंतु हा आरोपी कुठे काही मिळू देत नव्हता.
शिवाय ह्या श्रीपूर मर्डर केस मध्ये घटनास्थळाजवळ फक्त मुलीच्या डेड बॉडी शिवाय काहीही पुरावा म्हणून हाती लागले नव्हते. त्यामुळे आरोपीला शोधण्यासाठी आमची तपास यंत्रणा सुद्धा काही करु शकत नव्हती हा तपास पुढे नेऊ शकत नव्हती. मी अकलूज च्या कॉन्स्टेबल थोरात ह्यांच्याकडून "भोंगानंद बाबा " च्या मोबाईल वरील मागील ३ महिन्यांचे डिटेल्स मागविले. हा भोंदू बाबा श्रीपूर-बोरगाव मधील किती लोकांच्या सोबत भोंदूगिरीचे दुकान चालवत होता आणि त्याची भोंदूगिरी करत होता हे पाहावे लागणार होते. हा एकमेव मार्ग उरला होता त्यानुसार आम्ही कामाला सुरुवात केली.
त्या भोंदू बाबाच्या कॉल रेकॉर्डस् मध्ये ह्या गावातील एका नम्बर वरून मागील ८-१० महिन्यांत बरेच कॉल दिसत होते आणि तो नम्बर होता, "विनायक राघू शिंदे " याचा. एकतपुरे ला ह्या शिंदे च्या घरून काही माहिती मिळतेय का पाहायला सिव्हिल ड्रेस वर पाठविले आणि त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळविली. हा "विनायक राघू शिंदे " गावातच सरकारी दवाखान्यात बापाच्या ठिकाणी कामाला लागलेला. त्याचा म्हणे बाप तो लहान असताना वारला आणि मग घरात कमावत कुणीही नाहीये म्हणून थोडे दिवस आईला शिपाई म्हणून कामावर घेतलेलं. विनायक १८ वर्षाचा झाल्यावर ह्याला सरकारी कर्मचारी म्हणून शिपाई ह्या पदावर रुजू करून घेतलेलं. त्याच्या घरात त्याची बायको, २ मुली आणि आई राहत होते. अजून जरा माहिती मिळतेय का म्हणून मी सरकारी दवाखान्यात फोन लावला परंतु म्हणावी तशी माहिती मिळू शकली नाही. मला ह्या माणसावर संशय येऊ लागला त्यामुळे मी स्वतः दवाखान्यात जाऊन ह्या विनायक बद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्याची वागणूक जरा संशयास्पद जाणवत होती म्हणून त्याला टाकला गाडीत आणि आणला पोलीस स्टेशन ला. हा विनायक म्हणजे ४० किलो वजनाचं कीडमिड पोरग होत उगी बापाच्या पुण्याईने सरकारी दवाखान्यात कामाला लागलेलं. इतके मरतुकडे होते हे विनायकराव कि, जरा जोरात वारा आला तरी उडून जाईल. असा हा हाडाचा सापळा पाहून हे चिलटं काय कुणाला मारेल असे वाटले. त्याला व्यवस्थित विचारलं तर काहीही सांगायला तयार नव्हता. एकतपुरे ने ४-५ कानाखाली ओढल्या तर हा चक्कर येऊन पडला आणि बेशुद्ध झाला. तो बेशुद्ध झाल्यामुळे त्याला जिथून आणला होता तिथेच म्हणजे सरकारी दवाखान्यात त्याला परत नेवून ऍडमिट केला. हे प्रकरण सरळ वाटत नव्हतं म्हणून त्याच्यावर आणि त्याच्या घरच्यांवर नजर ठेवायला आमची माणसे पाळतीवर ठेवली.
त्याच्या शेजारच्यांना चौकशी साठी बोलावून घेतले परंतु सर्वजण सांगत होते कि, त्याला २ मुली आहेत शिवाय सरकारी नोकरी असल्यामुळे एकंदरीत सुखी कुटुंब आहे. बऱ्याच लोकांची चौकशी केल्यावर एक पॉईंट सर्वजण समान सांगत आहेत असे आमच्या निदर्शनास आले. तो समान पॉईंट म्हणजे , ह्या विनायक च्या आईला नातू म्हणजे ह्या नालायक माणसाला मुलगा पाहिजे होता. विनायक हा एकुलता-एक मुलगा आणि ह्याला २ मोठ्या आणि एक छोटी बहीण. ह्याचे लग्न झाल्यावर विनायकला दोन हि वेळेस मुलीचं झाल्या मुलगा झाला नाही. त्यामुळे वंशाला दिवा नाही ह्याची रुखरुख नेहमी ह्या घराला सतावत होती. मला हे समजत नाही कि, आज ही आपल्या समाजामध्ये मुलगा आणि मुलगी हा भेद का टिकून आहे ? अरे वंशाला दिवा पाहिजे परंतु मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी हे कसे काय लोक विसरतात ? माझा राग अनावर आला होता वाटत होत कि, विनायकला कुत्र्यासारखा ठोकून काढावा परंतु शांत डोक्याने ह्या प्रकरणाचा छडा लावणे गरजेचे होते. अजूनही आमच्यासमोर हा एक प्रश्न होता कि , ज्या मुलीचा खून झालाय ती चिमुकली होती कुणाची, तिचे आई वडील कोण ? का कुणीही पुढे येत नाहीये तिच्या बॉडी चा ताबा घेण्यासाठी ? त्यामुळे विनायकला शुद्ध यायला हवी आणि त्याने स्वतः झालेला प्रकार सांगणं अपेक्षित होत आम्हाला.
त्याचा फोन चेक केला परंतु काही सुगावा लागत नव्हता. विनायकला पहायला त्याच्या दोन बहिणी आणि त्यांचे नवरे आले होते. ह्याला तर ३ बहिणी आहेत आणि तिन्ही जवळच्याच गावात दिल्या होत्या मग फक्त दोघीच का आल्या? हा प्रश्न मला पडला. त्यामुळे मी त्याच्या तिसऱ्या बहिणीला बोलावून घेण्यास सांगितले. शेवटी संध्याकाळी ७ वाजता विनायकला शुद्ध आली आणि आम्ही परत त्याला राऊंड मध्ये घेतला. त्याची कसून चौकशी केली असता सुरवातीला त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी आम्ही ह्या विनायकला थर्ड डिग्री काय असते ते दाखवायला सुरु केले. तरीही तो तोंड उघडतच नाहीये म्हणून त्याच्या नव्याने बाळंत झालेल्या बायकोलाही घेतला रिंगणात तर ती फक्त इतकेच म्हणाली कि, "आम्हाला मुलगा हवा होता माझं मेलीच नशीबच फुटकं ह्या वेळीही मुलगीच झालीय मला. बाकी मला काहीही माहिती नाही तुम्ही सासूबाईंना विचारा". आज पर्यंतच्या अनुभवावरुन कोणत्या वेळेस कुणाला काय विचारावं हे आमच्या टीम ला चांगलच माहिती होत. आमच्या लेडीझ अधिकाऱ्यानं विनायक च्या बायकोला विचारलं, “ म्हणजे तुला काहीच माहिती नाही व ही मर्डर झालेली चिमुकली कोण आहे तुला माहिती नाही ? आज २ दिवस झाले ह्या चिमुकलीचे आई-बाप तिची डेड बॉडी ताब्यात घेण्यासाठी येत नाहीयेत. म्हणजे मग हे प्रेत बेवारस नोंद करून अंत्यविधी आम्हीच करतो”. विनायक च्या बायकोच्या तोंडावरील हावभाव बदलत आहेत हे आमच्या टीम च्या लक्षात येत होते. खरेतर खून कुणी केलाय हे आमच्या लक्षात आले होते, परंतु आम्हाला हेच त्यांच्या तोंडून ऐकायचे होते. विनायक व त्याची बायको अजूनही तोंड उघडायला तयार होत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याची पोलीस खाक्यात चौकशी सुरू केली त्याच्या समोर त्याच्या आईला आणि बायकोला १-१ कानशिलात लगावल्या . हळू हळू त्याला भीती वाटू लागली आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. तो अजून घडलेला प्रकार सांगतोय , इतक्यात विनायक ची तिसरी बहीण आणि तिचा नवरा पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले. ते दोघे आल्यापासूनच घाबरलेले वाटत होते. त्यांना आम्ही विचारलं तुम्ही काय काम करता? कुठे राहता? वगैरे वैगेरे. त्यांच्या बोलण्यातून बरेच काही संशयास्पद वाटत होते त्यामुळे त्यांना आम्ही डायरेक्ट थर्ड डिग्री दिली. मग ती तिसरी बहीण पोपटासारखी बोलू लागली. तिने सांगितले कि , "ती मुलगी विनायक चीच आहे आणि तिच्यावर रेप आणि तिचा खून विनायक नेच केलेला आहे". माझा अंदाज खरा ठरला ह्या , तिसऱ्या बहिणीकडे महत्वाचे धागेदोरे होते त्यामुळेच ती आली नव्हती, तिच्यामुळे ह्या केसमधील भयानक सत्य समोर आले. आज ह्या साधुसंतांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात , माणुसकीला काळिमा फासणारी घटना ह्या विनायक च्या हातून घडलेली कारण फक्त एकच ते म्हणजे, "वंशाला दिवा पाहिजे" . आता विनायक ला आपले पितळ उघडे पडल्याचे ध्यानात आले होते. मग त्यानेही आमचा जास्त वेळ न दवडता सर्व काही खरे खरे सांगण्यास सुरुवात केली. साहेब मी पापी आहे, मला माझ्या वडिलांच्या जागी कोणताही प्रयत्न न करता सरकारी नोकरी मिळाली त्यामुळे मला माझी नोकरी खूप प्यारी आहे . अरे मग नोकरी चा आणि ह्या मर्डर चा काय संबंध हरामखोरा? सांगतो साहेब, तुम्हाला तर माहीतच असेल कि , २००५ सालानंतर महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांसोबत दोन मुलांचे धोरण (two-child
policy) राबविली जात आहे. देशातील पाच राज्यांपैकी महाराष्ट हे एक असे राज्य आहे ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दोनपेक्षा जास्त मुलं होण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. दोनपेक्षा जास्त मुलं असणारी लोकं आपली नोकरी किंवा प्रोमोशन गमावू शकतात.
म्हणजे तुझी सरकारी नोकरी वाचविण्यासाठी तू स्वतः च्याच मुलीला मारून टाकलेस ? अरे गाढवा हे असले पाप करून सरकारी नोकरी करण्यापेक्षा भीक मागून जगला असता. पण पोस्टमोर्टम रिपोर्ट मध्ये तिच्यावर रेप हि झालेला होता असे नमूद केलेले आहे त्याच काय ? सांगतो साहेब, हि माझी ३ री मुलगी आहे २०१६ च्या जानेवारी मध्ये तिचा जन्म तिच्या आईच्या माहेरी झाला. माझ्या पहिल्या २ मुली आहेत त्यामुळे तिसरा मुलगा झालाच पाहिजे असा माझा आणि माझ्या आईचा हट्ट होता परंतु सरकारी नियमानुसार हे शक्य नव्हते. मला काहीही करून माझा सरकारी जॉब सोडायचा नव्हता कारण मी १० वि पास होण्यासाठी ४ वर्ष घालविले होते. त्यामुळे आम्ही सर्वानी म्हणजे माझी बायको, आई आणि माझी थोरली बहीण यांनी मिळून ठरविले कि, माझ्या बायकोला दिवस गेले कि, लगेच तिला तिच्या माहेरी पाठवायचं आणि मुलगा झाला तरच त्याला घरी आणायचं नाहीतर जन्म झाल्यापासून मुलीला थोरल्या बहिणीला देऊन टाकायचं. माझे लक नव्हते त्यामुळे तिसऱ्या ही वेळेस मुलगी झाली आणि ठरल्याप्रमाणे आम्ही तिला थोरल्या बहिणीला दत्तक म्हणून देऊन टाकले अगदी रीतसर नाव सुद्धा बहिणीचेच लावले. माझा राग आता अनावर आला होता मी म्हणालो, “हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाहीये विनायक मला त्या मुलीवर बलात्कार झालेला आहे त्याबद्दल तुझ्या तोंडून वास्तव काय ते ऐकायचे आहे”. साहेब तिसरीही मुलगीच झाल्यामुळे मला रात्रदिवस झोप लागत नव्हती शिवाय बायको आणि आई ह्यांचे सतत ह्या विषयावरून भांडण लागत होते. माझ्या थोरल्या बहिणीला ह्या स्वामी भोगानंद बाबा बद्दल चांगला अनुभव होता त्यामुळे तिने आम्हाला त्यांची मदत घ्यायचे सुचविले. एका अमावश्येदिवशी आम्ही सर्वजण बहिणीसोबत त्या बाबाच्या आश्रमात काही उपाय निघतोय का हे पाहण्यासाठी गेलो. बाबाने माझी व बायकोची पत्रिका पाहून काही मंत्र-तंत्र मारून आम्हांला एक उपाय आहे तुम्हाला मुलगा होण्यासाठी असे सांगितले. आम्हाला एक आशेचा किरण दिसू लागला त्या बाबानी आम्हाला पुढच्या अमावश्येला १० हजार रुपये आणि एक कोंबडी घेऊन परत येण्यास सांगितले. आम्ही आम्हाला काहीतरी मार्ग आहे वंशाचा दिवा मिळवायला ह्या गोष्टीच्या आनंदात आंधळे झालेलो. आता कायमचे ह्या तिसऱ्या मुलीला ताईला द्यायचे व बदल्यात महिन्याला ३ हजार रुपये खर्च म्हणून द्यायचे असा आम्ही निर्णय घेतला. मला हा जे सांगतोय ते ऐकताना खरंच त्याच्या बायको बद्दल आश्चर्य वाटत होते. मी जरा रागानेच त्याला विचारले, "अरे मूर्ख माणसा असे बुवा-बाजी करण्यामुळे मुले होत असतात का?". पुढे मग तू पैसे आणि कोंबडी घेवुन गेलास का त्या बाबाकडे? हो साहेब आमच्याकडे हा एकच मार्ग होता आणि ह्या बाबामुळेच आमच्या नात्यातील एका बाईला ५ मुलींनंतर जुळी २ मुले झाली होती त्यामुळे माझा त्या बाबावर खुप विश्वास होता. बाबानी आमच्याकडून पैसे घेतले आणि एक मार्ग सांगितला, ते म्हणाले, “हे भक्ता तुला सलग ३ वेळा मुलीच झाल्या आहेत आणि अजून पुढे हि तुझ्या नशिबात अजून २ मुली होण्याचा योग लिहिलेला आहे”. तर त्याला एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे, "तुला एका मुलीचा बळी द्यावा लागेल आणि फक्त बळी देऊन उपयोग नाही तुला असे काहीतरी तिच्या सोबत करावं लागेल कि, त्यामुळे परमेश्वर तुझ्या पदरात परत मुलगी टाकताना १०० वेळा विचार करेल”. थोडावेळ तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. आम्ही आम्हाला थोडा विचार करायला वेळ लागेल आम्ही पुढच्या अमावश्येला येतो असे सांगून तिथून पळ काढला. खूप विचार केला पण माझी बायको मुलीचा बळी देण्यास तयारच होत नव्हती. तिला खूप समजून सांगितले तिला सांगितले कि, तू जरी जन्म दिला असला तरी पोरगी जन्म झाल्यापासून ताईकडेच आहे . शिवाय तिचे नावही आपण ताईच्या नवऱ्याच्या नावावर नोंद केलेले आहे आणि आपण हे सर्व आपल्याच घराला वंशाचा दिवा मिळावा म्हणून करत आहोत. खूप-खूप समजून सांगितल्यावर ती तयार झाली परंतु ह्या वेळेस मुलगा नाही झाला तर काय? असा प्रश्न ती परत परत विचारू लागली. माझी थोरली बहीण इथेही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली . ती म्हणाली, “वहिनी जर ह्या वेळेस मुलगी झाली तर मी तिला आयुष्यभर नीट सांभाळेन”.
मी अजून एकवेळ त्या बाबाला फोन करून विचारले कि, “बाबा ह्या वेळेस नक्की मुलगा होईल ना?”. तर तो म्हणाला हो नक्की होईल आपण त्यासाठी काही विधी करून घेऊ म्हणजे काहीही अडचण येणार नाही. आता बाबाने दिलेला शब्द आणि त्याचा आज पर्यंत चा अनुभव त्यामुळे आम्ही निश्चिन्त झालो. पुढे आम्ही बाबाने सांगितले तसे ऐकायचे ठरविले आणि त्याने सांगितलेल्या काही-पूजा विधी त्याच्याकडून करून घेतल्या. माझ्या बायकोला अजून एकवेळ दिवस गेले आणि आमची उत्सुकता खूप वाढली. आम्हाला वाटले कि, बाबानी केलेल्या पूजेचाच हा प्रसाद असून त्यामुळेच माझी बायको गरोदर आहे. दर महिन्याला बाबाकडे जाणे-येणे वाढू लागले आणि शिवाय दर वेळेस हजार-दोन हजार रुपये दक्षिणा ह्या बाबाला आम्ही देऊ लागलो. बाबानी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वकाही करू लागलो बघता-बघता माझ्या बायकोला ८ वा महिना लागला. आता येत्या अमावश्येला पोरीचा बळी द्यायचं ठरलं सर्व तय्यारी झाली. बाबाने सांगितल्याप्रमाणे ३ दिवसापूर्वी म्हणजे ७ नोव्हेंबर २०१८ अश्विन अमावश्ये दिवशी मी मध्यरात्री श्रीपूर आणि महाळुंग च्या मध्यभागी रस्त्यालगत असणाऱ्या शेतात हे दुष्कृत्य केले.
विनायक जे काही सांगतोय ते ऐकून राग अनावर आल्यामुळे मी त्याच्या कानशिलात एक लगावून त्याला म्हणालो, “अरे अरे हरामखोरा त्या दिवशी फक्त अश्विन अमावश्याच नव्हती रे, त्या दिवशी लक्ष्मी पूजन ही होते”. तू माणूस म्हणून जगण्यास लायक नाहीयेस तू लक्ष्मी पूजन दिवशीच लक्ष्मी वर अत्याचार करून तिचा गळा घोटलास. “साहेब मला माफ करा, “माझ्या हातून खूप मोठे पाप झाले आहे”. मी माझा गुन्हा कबूल करतो. “तुम्ही मला फाशीच द्या”. इतक्यात विनायक ची बायको त्याच्या अंगावर आली आणि त्याचे नरडे दाबू लागली आमच्या लेडीज कॉन्स्टेबल नि तिला आवरले. ती ओरडत होती, "तू माझ्या मुलीचा खून केला आहेस आणि त्यावरच तुझे भागले नाही, तू आणि तुझ्या भाऊजी ने मिळून काल परत दुसरा खून केला आहेस सर्व काही कबूल कर". हे सर्व सुरु असताना विनायक चा एक भाऊजी पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. एकतपुरे नि त्याच्या मुसक्या लगेच आवळून टाकल्या.
विनायक च्या बायकोने संतापाने तोंड उघडल्यामुळे ह्या प्रकरणाला अजूनच वेगळे वळण लागले होते. विनायक ला मी परत विचारले, “आता तरी सर्व काही खरे खरे सांग, आता तू काहीही करू शकणार नाहीयेस”. विनायक रडू लागला आणि पुढील दुसऱ्या खुनाबद्दल सांगू लागला. म्हणजे हे प्रकरण फक्त बलात्कार आणि खून असे नसून दुहेरी हत्याकांड होते. विनायक ने सांगण्यास सुरुवात केली, तो म्हणाला कि, “त्या बाबा ने आम्हाला धोका दिला”. जेंव्हा डॉक्टर नि दिलेली बाळाची जन्माची तारीख मी फोन करून त्या बाबाला सांगितली तेंव्हापासून बाबाच्या बोलण्यात आम्हाला फरक जाणवू लागला होता. एकतपुरे विनायकाच्या गचुरीला धरून त्याला म्हणाले, "अरे हरामखोरा तरीही तू त्या बाबाचेच ऐकून आपल्या निष्पाप मुलीचा खून केलास ?"
त्या रात्री मी माझ्या मुलीला मारून घरी परतलो तेंव्हा घरी बायकोच्या पोटात वेदना सुरु झालेल्या ती रात्रभर ओरडत होती. आम्ही तिला घेऊन अकलूज च्या दवाखान्यात गेलो शेवटी सकाळी ६ वाजता अखेर तिने एका गोंडस अश्या मुलीला च जन्म दिला. मी खूप रागात होतो. कारण ह्या वेळेस मुलगा व्हावा म्हणून आम्ही काय-काय केले होते ते आम्हालाच माहिती. मी लगेच त्या नालायक बाबा ला फोन लावून मुलगी झाल्याबद्दल सांगितले परंतु त्याने उलट मलाच दम दिला तो म्हणाला, “काल रात्री तू जे काही तुझ्या मुलीसोबत केले आहे त्याचा मी साक्षीदार आहे,” त्यामुळे इथून पुढे मला अजिबात फोन करू नकोस. मी अजून बोलतोय तोपर्यंत त्याने मलाच शिव्या देऊन लगेच फोन बंद करून ठेवला. मी माझ्या भाऊजीला फोन करून ह्या बाबा बद्दल सांगितले आणि त्याचा काटा काढायला पाहिजे नाहीतर आपल्या सर्वाना जेलमध्ये जावं लागेल ह्याची जाणीव करून दिली. तो बाबा फोन बंद करून गाव सोडून पळून जाणार हे आम्ही जाणून होतो. त्यामुळे माझे काही मित्र अकलूजच्या बस स्टॅन्ड जवळ बाबावर नजर ठेवून होते. कदाचित बाबाला आमच्या फिल्डिंग बद्दल माहित झाल्यामुळे तो बस स्थानकावर न येता रस्त्यावरून येण्या जाणाऱ्या वाहनांना हात करून कसातरी गाव सोडून इंदापूरच्या जवळ पोहचला होता. बाबा इंदापूर कडे निघाला आहे हे माझ्या भाऊजींना माहित झाले आणि त्यांनी तो अपघात घडवून आणला आणि त्या बाबाला जाग्यावरच चिरडून टाकले.
पोलिसांनी या प्रकरणाचा पुरेपूर तपास करून दोषारोपपत्र दाखल केले आणि ह्या दुहेरी हत्याकांडामध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सामील असणाऱ्या सर्वाना बेड्या ठोकल्या. प्रमुख आरोपी, "विनायक राघू शिंदे " याने केलेले कृत्य ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना आहे; तसेच आरोपीला आपण केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप झालेला नव्हता, त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रशांत कोरे यांनी केली होती. परंतु कोर्टाने या प्रकरणी आरोपीला भारतीय दंड संहिता कलम ३०२ नुसार जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड; तसेच ३७६ (बलात्कार) नुसार दहा वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड, २०१ (पुरावा नष्ट करणे) नुसार तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी कोर्टात करण्यात आली होती. परंतु आरोपीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे म्हणून सरकारी वकील प्रशांत कोरे यांनी या शिक्षेविरुद्ध सरकार पक्षातर्फे मुंबई हायकोर्टात अपील केले व अखेर २ वर्षाच्या न्यायालयीन खटाटोपीनंतर त्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टाने सुनावली. अशाप्रकारे अखेर त्या चिमुकलीला न्याय मिळाला परंतु आजही माझ्या डोळ्यासमोरून तिचा निरागस चेहरा जात नाहीये.
टीप : सदर कथा व त्यातील पात्रे व ठिकाणे पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्यांचा संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.



No comments:
Post a Comment