Latest technology news and Review, Motivational Quotes, use of Online learning techniques to improve self-studies about Deep Learning and AI. Benefits of Sahajayoga meditation and experiences

Full width home advertisement

Technology

Entertainment

Post Page Advertisement [Top]

                                            महाराष्ट्र दिन 



                                               
  
पेप्सी कोला
     
      पंढरपूर मधल्या विवेक वर्धिनी विद्यालयामध्ये मी तेंव्हा आठवी ला असेन दररोज शाळा सकाळी .३० ते १२ वाजेपर्यंत असायची. माझा दिनक्रम एकंदरीत पुढील प्रमाणे असायचा, शाळा सुटल्यावर घरी येऊन जेवण करून लगेच आमच्याच गल्लीत जवळच फुलांचा लिलाव असायचा तिथून - ढीग कुंद किंवा मोगरा घ्यायचा आणि घरी यायचं. मग त्या फुलांचे वाजेपर्यंत गजरे ओवून लगेच विकायला निघायचं. मग पायाला भिंगरी लावल्यागत पंढरपुरातील स्टेशन रोड पासून गजरे विकण्यास सुरुवात करायची. संध्याकाळी वाजेपर्यंत चालत-चालत पंढरपुरातील अंदाजे १०-१२ कि.मी. अंतर तुडवायचे आणि ते गजरे विकायचे. गजरे विकण्याच्या धंद्यात रोज एक वेगळा अनुभव मिळायचा शिवाय इतक्या लहान वयात मला प्रत्येक धंद्यात स्पर्धा असते हे तेंव्हापासुन शिकायला मिळत होते . कधी कधी खूप वैताग यायचा ह्या धंद्यात कारण, इतके सुंदर गजरे असूनही लोक आपापल्या बायकांसमोर फक्त आठ अन्याला असणारा गजरा "एक रुपयाला गजरे दे" असे म्हणून आपले व्यवहार ज्ञान पाजळताना पहायला मिळायचे. काही चिंधीचोर श्रीमंत लोक रुपयाला एक डझन गजरे दे म्हणून माघे लागायचे. खरे तर मला ह्या गजरे विकण्याच्या धंद्यात खूप परवडायचं, कारण मला सर्व खर्च २० रुपये यायचा आणि त्याचे ५० रुपये व्हायचे. मग त्या ५० रुपयातील २० रुपये उद्यासाठी ठेवून उरलेले ३० रुपये घरी द्यायचे अशी सवय झाली होती. खूप वेळा शेवटचे १०-१२ उरलेले गजरे जिजामाता उद्यान समोर असणाऱ्या "कुमार पाव रगडा" नावाच्या गाड्यावर देऊन त्या बदल्यात एक पाव रगडा खायचा असा एकंदरीत माझा दिनक्रम होता. गरिबीमुळे लहानपनापासूनच आपली पोर संसाराला हातभार लावत आहेत हे माझे आई-वडील जाणून होते. उगीचच फालतुचे धंदे करता आपली हि पोर काहींना काही काम करत आहेत याबद्दल त्यांना कौतुक वाटायचं. त्यातल्या त्यात मी आपलॆ शिक्षण सांभाळून धडपड करतोय याबद्दल माझ्या गल्लीतील सर्वाना अप्रूप वाटायचं. कारण माझ्या बरोबरीची आमच्या गल्लीतील पोर शाळा सोडून कोण गांजा विकतय , तर कोण मटका घेतंय , तर कोण शिंदी पितंय हे असे अनेक उद्योग करायचे. त्यापेक्षा आपलं पोरग काहीतरी वेगळं करतंय ह्यातच माझ्या घरच्यांना समाधान वाटत होतं.
        दिवसभर खूप चालून झाल्यामुळे रात्री माझे पाय खूप दुखायचे आणि मी झोपेत माझे पाय आपटायचो असे माझी आई मला सांगायची. पांडुरंगाच्या कृपेमुळे कधी कधी कमी वेळात जास्त गजरे विकले जाण्याचा योग जुळून यायचा. बऱ्याच वेळा माझे सर्व गजरे कैकाडी महाराज मठासमोर अगदी -१० मिनिटात विकले जायचे. कारण तिथे बाहेरगाव हुन आलेले वारकरी एखाद्या ट्रॅव्हल्स मधून उतरायचे आणि त्यात एका फॅमिली ने गजरा घेतला कि, बाकीचे पण पटा-पट माझे गजरे विकत घ्यायचे. मला खूप आनंद व्हायचा जेंव्हा असे लगेच गजरे विकले जायचे तेंव्हा, पण हे क्वचितच व्हायचं. कैकाडी महाराज मठाजवळ नेहमी एक संत्या नावाचा पोरगा पेप्सी कोला विकायला यायचा तो माझा चांगला मित्र झाला होता. त्याच्या पेप्सी विकण्याच्या धंद्यात माझ्या गजरे विकण्या सारखे कष्ट नाहीयेत असे मला वाटू लागले. एकतर मला गजरे स्वतःला बनवावे लागत शिवाय क्वचित एखादा माणूस सांगितलेल्या किमतीत गजरे घेण्याचं धाडस करायचा. तसे संत्याच्या पेप्सी विकण्याच्या धंद्यात नव्हते. एकतर संत्याला पेप्सी स्वतःला बनवावी लागत नसे, शिवाय पेप्सी सांगितलेल्या किमतीतच लोक विकत घेतात. हळू-हळू माझ्या मनात असे विचार येऊ लागले कि, आपण आपला गजरे विकण्याचा धंदा बंद करून पेप्सी विकायला सुरुवात करायला पाहिजे . गजरे विकायला वाजल्यानंतर सुरु करावं लागायचं पण पेप्सी सकाळी १० वाजल्यापासून विकू शकतो हाही एक फायदा होता. शिवाय पेप्सी विकायला जास्त फिरायची गरज नाही. असे अनेक फायदे लक्षात आल्यामुळे मी त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पेप्सी विकण्याचा निर्णय घेतला. पण म्हणतात ना, फक्त इच्छाशक्ती असून चालत नाही क्रियाशक्तीची पण साथ असायला पाहिजे. माझी शरीरयष्टी खूप किरकोळ असल्यामुळे माझी इच्छा असूनही तो पेप्सी च्या कारखान्याचा मालक मला पेप्सी चा गाडा द्यायला तयार नव्हता. मी १०-१५ दिवस रोज सकाळी संत्यासोबत जाऊन त्या मालकाला विंनती करण्याचा प्रयत्न केला पण त्या मालकाला माझ्यावर दया आली नाही. त्या मालकाचं पण बरोबर होतं म्हणा. माझी तबियेत इतकी किरकोळ होती कि, त्याने जरी पेप्सी चा गाडा दिला असता, तरी मला तो गाडा ढकलायला एक पोरग कामाला ठेवावं लागलं असत. शेवटी त्या मालकाने एक मार्ग काढला मला म्हणाला, " हे बघ, तुला मी काय गाडा देत नाही," त्या ऐवजी हे पेप्सी कोला डबडं आहे. तुला हे डबडं खांद्यावर अडकवून पेप्सी विकावी लागेल ह्या डबड्यात जास्तीत जास्त १०० पेप्सी बसतात.
       मला वाटलं बरे झाले चला आता हा धंदा सुरु करू तेव्हडेच थोडे कष्ट कमी आणि फायदा ज्यादा. परंतु हा माझा गैरसमज होता कारण ते डबडं त्यामध्ये पेप्सी भरल्यानंतर खूप जड व्हायचे. त्या वजनदार डबड्याला घेऊन पेप्सी विकण्याच्या पहिल्याच दिवशी माझा खांदा इतका दुखू लागला कि, हाथ बधिर झाल्यासारखे वाटू लागले. पण माझं मन मलाच समजून सांगायचं कि, " बाबा रे तुला हळू-हळू सवय झाली कि तुझ्या खांद्याला काही वाटायचं नाही". आणि खरंच मला हळू-हळू सवय झाली आणि मी आवडीने "पेप्सी कोला, पेप्सी थंडगार पेप्सी कोला " असा सूर काढत पेप्सी विकू लागलो. शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे रोज सकाळी ते ११ वाजेपर्यंत मी कैकाडी मठासमोर १०० पेप्सी विकायचो. मग सोबत बांधून आणलेल्या डब्यातील जेवण करून ११.३० ते १२.३० ह्या वेळेत सरगम टॉकीज बाहेर १०० पेप्सी विकल्या जायच्या. आणि उरलेल्या वेळात १००-२०० पेप्सी सहज विकल्या जायच्या. अश्या प्रकारे दिवसभरात ३००-४०० पेप्सी विकायचो त्यामुळे दुखणारा खांदा कधी जाणवलाच नाही. परंतु ह्या वयात हे अवघड काम करताना पाहिले तर घरातील लोक ओरडतील म्हणून त्यांना सांगता गपचूप आणि मनापासून आपला पेप्सी विकण्याचा धंदा करत राहिलो.
       दरवर्षी मे ला आमच्या शाळेचा वार्षिक परीक्षेचा निकाल असायचा. त्या दिवशी निकाल होता मी खूप आनंदी होतो कारण मी आठवी ला चांगले मार्क मिळवून पास झालो होतो. प्रमाणपत्र घरी ठेवून फक्त आई आणि आबांच्या पाया पडून मी निघालो आपल्या रोजच्या कामाला म्हणजे पेप्सी विकायला. नेमकं त्या दिवशी माझी आई पंढरपूर हुन श्रीपूरला माझ्या मावशीकडे काही कामानिमित्त निघाली होती. तिने बस मध्ये तिकीट पण काढले होते आणि बस नेमकी सरगम टॉकीज समोरून जात होती आणि मी त्या टॉकीज समोर पेप्सी विकत होतो. मला बस च्या खिडकीतून माझ्या आई ने lहिले आणि त्या माऊलीच्या डोळ्यात पाण्याची धार सुरु झाली. तिने लगेच बस थांबवायला लावून माझ्याकडे धाव घेतली आणि "आताच्या आत्ता हे असले धंदे बंद कर" म्हणून रडू लागली. मला पण गहिवरून आले कारण ती मुसमुसून रडत होती आणि म्हणत होती, " रातभर खांदा दुखतोय म्हणून माझं लेकरू तडफडतय , कशापायी तर हे पेप्सी डबडं अडकवून गावभर फिरतंय".
खरे तर मला पेप्सी विकण्याचा धंदा खूप आवडू लागला होता पण माझ्या आई ला ते पेप्सी डबडं माझ्या खांद्याला अडकविलेलं पाहून माझ्यापेक्षा जास्त वेदना होताना मी पाहत होतो. त्या दिवशी माझ्या फक्त पेप्सी उरल्या होत्या पण आई मला ते पेप्सी डबडं परत दे म्हणून ओढत नेऊ लागलेली पाहून मला खूप वाईट वाटत होत.अनेक विचार मनात घोळू लागले होते. वाटत होतं कि, देवा मला पेप्सी च्या डबड्याऐवजी पेप्सी चा गाडा दिला असता तर हि वेळ अली नसती .परत असे हि वाटत होते कि त्या मालकाने गाडा असूनही आपल्याला दिला नाही, एक मन म्हणायचं आपली तबियेत संत्यासारखी असती तर आपल्यावर हि वेळ अली नसती. अशीच असंख्य विचारांची घालमेल सुरु असताना ते मालकाचं दुकान आलं आणि मी ते पेप्सीच डबडं परत दिल. कदाचित आई सोबत असल्यामुळे मला थोडा जोश आला आणि मी त्या मालकाला धमकीच्या स्वरात म्हणालो, "मालक ध्यानात राहू द्या sss तुम्ही मला पेप्सी चा गाडा दिला नाहीsss म्हणून माझ्या आईच्या डोळ्यात मी आज पाणी lहिले , मला थोडा मोठा होऊ द्या , मग दाखवितो साला sss आपला स्वतः चा पेप्सी चा गाडा असेल.".
       अश्या प्रकारे मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मी साजरा केला होता .......आजही पेप्सी चा गाडा दिसला कि तो दिवस मला आठवितो.
लेखन- अनिल पिसे.
गजरे











No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]