Latest technology news and Review, Motivational Quotes, use of Online learning techniques to improve self-studies about Deep Learning and AI. Benefits of Sahajayoga meditation and experiences

Full width home advertisement

Technology

Entertainment

Post Page Advertisement [Top]

पंढरीची वारी ......







             पिढ्यान पिढ्या पंढरपूरला वारीला चालत जाणारा वारकरी पाहिला कि मन भरून येते . काय हि भक्ती आणि आणि श्रद्धा माझ्या विठू माऊली वर .मला धन्यता वाटते कि माझा जन्म पंढरपुरात झाला. बऱ्याच लोकांना माहित असेल कि, संत शिरोमणी सावता माळी हे कधीच पंढरपूर ला आले नव्हते पण त्यांची पांडुरंगा वर असणारी निस्सीम भक्ती इतकी आंतरिक होती कि स्वतः पांडुरंगाना त्यांच्या भेटीसाठी अरण ह्या गावी जावं लागलं.वारीनिमित्त या लेखामध्ये लहानपणा पासून पाहिलेला वारकरी कसा होता हे मांडू इच्छितो. कदाचित तुम्ही पाहिलेला वारकरी वेगळा असू शकतो. माझं घर विठ्ठल मंदिरापासून खूप जवळ होते, लहानपणापासून दरवर्षी काही वारकरी आमच्या घरी भरायचो म्हणजे ठराविक रक्कम घेऊन त्यांची राहण्याची सोय आमच्या घरी आम्ही करायचो. वेगवेगळ्या वयानुसार आपल्या मनात समोरील व्यक्ती बद्दल असणाऱ्या प्रतिमा वेगवेगळ्या असतात . म्हणजेच जस-जसे आपले वय वाढत जाते तसे आपल्या मनात समोरील व्यक्ती किंवा समूह यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो.जसे कि, वय ७-८ वर्ष असेल तेंव्हा वाटायचे वारीमुळे शाळेला सुट्टी मिळते आणि ह्या वारकऱ्यांसोबत फिरायला मिळते हाच सर्वात मोठा आनंद. त्या वयात आपल्याला भेटणाऱ्या आणि बऱ्यापैकी प्रेम देणाऱ्या व्यक्तींबद्दल लगेच आपुलकी निर्माण होते. जशी वारीची सांगता जवळ यायची तसे मला खूप वाईट वाटायचे कारण ह्या वारीच्या ८-१० दिवसात आमच्या घरात भरलेल्या वारकऱ्यांबद्दल आपुलकी निर्माण होत असे . असे वाटायचे कि ह्या वारकऱ्यांसोबत ह्यांच्या गावी जावं . मला आठवते कि तें वारकरी कमीत कमी तंबाखू /बिडी /सिगारेट अशी व्यसने सोबत घेऊन असायची पण तेंव्हा त्याच मला काहीच वाटायचं नाही .कारण माझ्या बालबुद्धीचा असा समज होता कि, जगातील प्रत्येक माणसाला काही ना काही व्यसन असतेच . माझ्या घराशेजारी एका महिला किर्तनकाराचे एक घर होते, त्या घरात किर्तनासाठी लागणारे आवश्यक सामान म्हणजे टाळ ,मृदूंग वगैरे वगैरें होते. त्या किर्तनकार बाईचे नाव होते संत लताबाई लातूरकर. ती बाई फक्त वारीसाठी पंढरपुरात यायची बाकी वर्षभर त्या घराची चावी आमच्या घरी असायची आणि ते घर बंद असायचे. तर हि लताबाई लातूरकरिन वारीच्या दिवसात दररोज संध्याकाळी ७-११ किर्तन करायची आणि बराच पैसा कमवायची. खूप वारकरी तिच्या पाया पडायचे आणि कीर्तन सुरु असताना तिला ५०/१००/२०० रुपये आपापल्या कुवतीप्रमाणे द्यायचे त्या बदल्यात ती बाई फक्त त्या वारकऱ्याच नाव माईक मध्ये पुकारायची. केवळ आपले नाव पुकारले जावे आणि आपण आपल्या बाजूच्या वारकऱ्यापेक्षा जास्त पैसे दिले हा असा फाजील मोठेपणा जगाला दाखवून देण्यासाठी चढाओढ लागायची . तेंव्हा त्याच मला काहीच वाटायचं नाही कारण वय लहान आणि वाचन कमी. तसे पाहता हि किर्तनकार बाई सुद्धा तंबाखू पान वैगरे सर्व व्यसनांनी ग्रासलेली होती. पण , "लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण" वगैरे असले काही मला माहित नव्हते त्यामुळे मला तिच्याबद्दल सहानभूती वाटायची. काही दिवसांनी कानावर आले कि त्या किर्तनकार बाईचा खूप मोठा अपघात झाला आणि त्यात ती गेली. मला तेंव्हा थोडं वाईट वाटलं, इतकं पांडुरंग, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउली यांच्याबद्दल जगाला किर्तनाच्या माध्यमातून ज्ञान देणारी बाई इतक्या वाईट पद्धतीने का वारली असेल याच्याबद्दल मला अजिबात काही कळत नव्हतं. पण काहीतरी चुकतंय हे सतत जाणवत होत, एकतर भक्ती करण्याची पद्धत चुकीची असावी अथवा ज्याची भक्ती करतोय त्यांच्यापर्यंत ह्या लोकांची भक्ती पोहचत नसावी असे वाटायचे . त्याचे उत्तर मला मिळाले ते म्हणजे काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात एक तुकाराम महाराजांनी रचलेला अभंग आला त्याचा अर्थ असा होतो कि, “आपल्या शिष्याकडून पैसे उकळणारा गुरु हा राक्षस असतो”.
शिवाय तुकाराम गाथेमध्ये असेही वर्णिले आहे कि,

काही न मागे कोणाशी I तोचि आवडे देवाशी II
देव त्यासी म्हणावे I त्याचे चरणी लिन व्हावे II

असो आता पंढरपुरात माझ्या माहिती प्रमाणे वारीत १५-२० दिवस सर्व दारूची दुकाने सील केलेली असतात म्हणजे बंद असतात . पण प्रत्येक दारूच्या दुकानांमागे काही लोक दारू विकतात. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय कि, वारीत खुलेआम दारूविक्री होते . आता मी त्या दारू विकणाऱ्या लोकांच्या विरोधात नाहीये, कारण ते त्यांच्या पोटापाण्याचा धंदा करत आहेत . "पिणारा पितो म्हणूनच विकणारा विकतो ". माझ्या माहितीप्रमाणे १९९५-९६ दारूच्या एका बाटलीचा भाव जो नेहमीचा असायचा तो म्हणजे १८ रुपये ला एक क्वार्टर असायचा , त्याच बाटलीची किंमत वारीत १०० रुपये असायची. १८ ची बाटली १०० ला असून सुद्धा वारकरी लाईन लावायचे याचा अर्थ काय ? आपले वारकरी वारीचे ते ८-१० दिवस सुद्धा दारुविना राहूच शकत नाहीत.
मला बरेच दिवस असे प्रश्न सतावत होते कि, हे असे का ? पिढ्यान पिढ्या वारीत चालत येतोय वारकरी पण तरीसुद्धा एकही व्यसन का सुटत नाहीये ह्या वारकऱ्यांच ?
असो वारीत दर्शनासाठी मंदिरापासून ते गोपाळपूर पर्यंत रांगा आसायच्या. तेंव्हा माझे वय १०-१२ असेल मी ह्या दर्शन रांगेत लेमन गोळ्या विकायला जायचो. आता , मी लेमन गोळ्या १ रुपयाला १० विकायचो तर हे वारकरी तिथे घासाघीस करायचे १ रुपयाला २० गोळ्या दे म्हणायचे. हळूहळू माझ्या हे लक्षात आले कि हे वारकरी ह्या दर्शन रांगेत सुद्धा सिगारेट बिडी ओढतात आणि सांगेल त्या किमतीत विकत पण घेतात. शिवाय माझ्याच गल्लीतला माझा एक मित्र फक्त रात्री ४-५ तास सिगारेट -तंबाखू -बिड्या विकायचा आणि माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवायचा . मग मी नाईलाजाने बिडी, काडी, सिगारेट आणि लेमन असे प्रकार वारीत विकण्यास सुरुवात केली . विप्र दत्त घाट ते गोपाळपूर सकाळपासून रात्री पर्यंत एक खोके गळ्यात अडकवून हा वारीतील वारकऱ्यांना बिड्या काड्या सिगारेट विकण्याचा धंदा करू लागलो . खरे तर माझ्या मनाला हे पटत नव्हते पण काय करणार वारीच्या सिझन मध्ये ४ पैसे कमविण्यासाठी लेमन गोळी विकणारा पोरगा बिडी- काडी- सिगारेट ओरडत ह्या वारकऱ्यांच्या रांगेत फिरत होता कारण "जे खपत तेच विकावं " हे माझ्या लक्षात आले होते.
आता वरील उदाहरणांवरून आपल्या हे लक्षात येईल कि, संत शिरोमणी सावता माळी यांच्या भक्तीच्या धाग्याची पकड मजबूत असल्यामुळे देवाला त्यांच्याकडे यावं लागलं, म्हणजे आपले परमेश्वराशी Connection मजबूत असणे हि भक्तिमार्गाची पहिली पायरी असावी. तसेच किर्तनकार बाईचे उदाहरण आपल्याला असे दाखवून देते कि, संत तुकाराम महाराजांनी सांगितल्या प्रमाणे न वागता किर्तनकार लताबाई लातुरकरिंन हि लोकांकडून पैसे गोळा करायची त्यामुळे तिचा अपघाती मृत्यू झाला .आज जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर असे अनेक किर्तनकार पहायला मिळतात कि त्यांची बुकिंग २-२ वर्ष मिळत नाही त्याला कारण आपले वारकरी अश्या लोकांना नको तितके पैसे देऊन अवास्तव महत्व देतात .
मी अश्या कोणत्याही किर्तनकार महाराज यांच्या विरोधात नसून केवळ त्यांना अवास्तव महत्व देऊन खऱ्या भक्ती पासून दूर गेलेल्या माझ्या वारकरी बंधुभगिनींना सांगू इच्छितो कि, "देव भावाचा भुकेला ..... " ह्या अभंगाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे.
दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥१॥
ध्यान लागो ऐसे हरी । तुज चरणी तैशापरी ॥२॥
आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळास ॥३॥
लोभ्या कळांतराची आस। बोटे मोजी दिवस मास ॥४॥
तुका म्हणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥५॥
– संत तुकाराम महाराज
वरील अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात - हे प्रभू, एक महिला तिच्या डोक्यावर पाण्याच्या भांड्यांची रास घेऊन जाते. तिचे लक्ष फक्त डोक्यावरील भांड्यावर आहे ! तसेच माझे ध्यान तुज्याचरणी लागो I
In abhanga “Dudivar Dudi” Sant Tukaram Maharaj says – “O Lord, that gujarati lady walks carrying so many water-pots on her head. Her attention on pots doesn’t go away even for a second! That frail incapable man constantly craves that somebody will invite him for a good meal and that greedy money-lender, day and night counts on his fingers, money he has to collect from others. Please give me single pointed focus and unwavering passion like them! As I transact in this world, let my mind constantly remain meditating only on your lotus feet ! Let it not get swayed by anything else. Anything other than you is pain. Please don’t give me that! ”
आजपर्यंत आपण सर्वानी वारकरी म्हणजे काय याचा अर्थ जो 'वार' धरतो (उपवास करतो ) असा पहिला असेल तर तसा नसून वारकरी म्हणजे काय तर , "वार =वारा (वायू/चैतन्यलहरी ) करी (कर=हात ) " ज्याच्या करीतून (हातातून) वारा वाहतो त्याला वारकरी म्हणतात . सहजयोगाद्वारे कुंडलिनी जागृती म्हणजेच आत्मसाक्षात्कार मिळतो आणि आत्मसाक्षात्कार मिळाल्यावर तत्क्षण साधकाच्या हातातून चैतन्यलहरी वाहतात. सहजयोग शास्त्रोक्त असून पूर्णतः विनामूल्य आहे शिवाय न सांगता आपणाला असणारी सर्व प्रकारची व्यसने आपोआप नष्ट होतात.
तर मग वाट कशाची पाहताय ? आजच सहजयोग ध्यानधारणा केंद्रावर जाऊन पांडुरंगाचे जागरूक असे वारकरी होऊ आणि खऱ्या अर्थाने एकादशी साजरी करू . आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
वरील लेख कोणत्याही व्यक्ती अथवा समूह यांच्या भावना दुखविण्यासाठी लिहिलेला नसून जे लहानपणापासून पाहिले तेच लिहिले आहे .
लेखन-अनिल पिसे .

No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]